कुठलाही सिनेमा समजुन घेण्यासाठी आपल्याला त्याची पार्श्वभूमी लक्षात घेणं गरजेचं असतं, तो कुठे घडतो, तो कुठल्या काळातला आहे, प्रदेश कुठला आहे, थोडक्यात काय तर स्थळ, काळ आणि वेळ या गोष्टी जरी समजून घेतल्या तरी आपणास दिग्दर्शकाचा दृष्टिकोन समजायला मदत होते, आणि मग सिनेमाचे तांत्रिक घटक, शैली हे ही तितकंच महत्त्वाचे आहे, म्हणायचं एवढंच की सिनेमा बघत बघत तो आपण शिकणं ही गरजेचं आहे
"LAMB" 2021
DIRECTOR - Valdimar Jóhannsson
आजचा सिनेमा आहे थेट आइसलँड मधून, या देशाचा अभ्यास केला तर लक्षात येते, की कमी लोकसंख्या असलेला हा देश आणि इथे राहणारे लोकं हे मानसिक आजाराने ग्रस्त आहे, आणि दर किलोमीटर अंतरावर जर अभ्यास केला तर लक्षात येईल की फक्त 3 लोकं 4 या अंतरावर राहतात, थोडक्यात एकलकोंडी आणि कायम कामात व्यस्त राहणारी ही मंडळी आहे, आणि अशाच एका परिवाराची गोष्ट दिग्दर्शकाने आपल्यासमोर काल्पनिक (fantasy) स्वरूपात मांडली आहे आणि ती गोष्ट म्हणजे "लॅम्ब" ( मेंढीच पिलू ज्याला आपण कोकरू म्हणतो)
इंगमर आणि मारिया हे दोघे आइसलँड मधील एका प्रदेशात एका डोंगराच्या पायथ्याशी राहत असतात, आजूबाजूला कुठेच घर नाही आहे फक्त शांतता, आणि दुरवर पसरलेले डोंगर, बर्फ, आणि कुरणे, आणि अशीच काही परिस्थिती त्यांच्या दोघांच्या मनाची देखील दाखवली आहे, कमी सवांद, तेवढ्यापुरते हसणं, आणि आपल्या पाळलेल्या मेंढ्यांना गवत पाणी करणं, त्यांची काळजी घेणं, हेच काय त्यांचे एकंदरीत आयुष्य, नवीन काहीच नाही,
इंगमर आणि मारिया या दोघांना बघून नेहमी असं लक्षात येते की ते सगळं काही करून कंटाळले आहे, आता त्यांच्या आयुष्यात नवीन असं काहीच दिसत नाही आणि त्यांना ही काही वाटत नाही, दोघांच्या लग्नाला बरेच दिवस झाले आहे, पण त्यांना अजुनही मुलं नाहीं याच दुःख वेगळंच, आणि या सगळ्या भावनिक, मानसिक, गोष्टी अतिशय सुंदर पणे दाखवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे, उत्कृष्ट छायांकनाने आपल्याला त्या गोष्टी, ती स्थिति, समजून घ्यायला उशीर लागत नाही, त्यामुळे संवादाची गरजच भासत नाही, हे विशेष आहे,
इंगमर आणि मारिया याचा अंगिक आणि सात्विक अभिनय उल्लेखनीय आहे, आणि तो दिग्दर्शकाने खुप मन लावून टिपून घेतला आहे याची जाणीव बघताना होते,
ज्या प्रमाणे सुपर नोव्हा च्या स्फोटामुळे या आकाशगंगेत अनेक ग्रहांची निर्मिती सुरु होण्यास अब्जो वर्षांचा कालावधी लागला, त्याच प्रमाणे या दोघांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण येण्यासाठी एक विलक्षण घटना घडायला वेळ लागला होता, म्हणून काय याचा आनंद या दोघांना ही अव्यक्त झाला होता, त्या सुखद घटनेनं त्यांच्या जगण्याला एक अर्थ दिला होता, पण त्याच्या या कालावधीचा अंदाज त्यांना नव्हता,
झालं असं की, त्यांच्या मेंढ्यांच्या आखरात दर दोन तीन दिवसाला एक नवीन पिलाचा जन्म व्हायचा, आणि हे दोघेही काळजीपूर्वक त्या मेंढीची डिलिव्हरी करायचे, आणि एक दिवस अश्या पिलाचा जन्म झाला, की त्याची कल्पना करणं ही शक्य नव्हतं, मेंढीच शीर आणि माणसाचं शरीर (अर्धा प्राणी आणि अर्धा मनुष्य) असं ते बाळ जन्माला येतं, बराच काळ ते बाळ प्रत्यक्षात पूर्ण न दाखवता दिग्दर्शकानं प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे,
इंगमर आणि मारिया दोघेही त्याची खुप काळजी घेताना दाखवले आहे, आणि तिला ते एक नाव देतात "इडा" तिला अंघोळ घालण्यापासून तर शिकवण्या पर्यंतची सगळी जबाबदारी ते पालक म्हणून पार पाडत असतात, पण इकडे तिची खरी आई आपल्या पिलापासून दुरावल्या मुळे सारखी ओरडत असते, आणि एक दिवस ती इडा ला घेऊन घरापासून दूर निघून जाते, हे दोघेही ही इडा ला खूप शोधतात, आणि शेवटी घरापासून दूर अंतरावर इडा आणि तिची आई दिसते, मारिया ला या गोष्टीचा प्रचंड राग येतो, कारण ती इडा च्या प्रेमामध्ये इतकी आंधळी झालेली असते की, तिचा स्वभाव, वागणं, हळूहळू बदलत जाते, आणि स्वार्थ तिच्या मनात राज्य करायला लागतो, आणि ती तिच्या खऱ्या आईला गोळी घालून मारून टाकते, आणि मग एका रहस्यकथेला सुरुवात होते, अशी कथा जिच्या शेवटाची तिळमात्र कल्पना सुध्दा प्रेक्षकांना जाणवत नाही, नेमकी हे सत्य आहे, की मारिया ने केलेली कल्पना आहे हा प्रश्न शेवटी उपस्थित राहतो
सिनेमाचं प्रोड्युकॅशन डिजाईन, तसेच संकल्पना खुप उत्तम प्रकारे हाताळली आहे, तसेच सरळ साधं संकलन, उत्कृष्ट छायांकनाने लक्ष वेधून घेतात, आणि अपेक्षित नसलेला सिनेमाचा शेवट, जणू अनेक प्रश्नांचा डोंगर आपल्या समोर उभा करतो, कोण बरोबर आणि कोण चूक या खेळात कधी कधी तटस्थ म्हणून भूमिका घेणं गरजेचं असतं, ते का ? सिनेमा बघून लक्षात येईल, मारिया या पात्राला सिनेमाचा केंद्र बिंदू ठरवून, प्रोटॉग्निस्ट आणि अंटोग्निस्ट यांच एक अद्भुत मिश्रण दिग्दर्शकाने प्रेक्षकांसमोर मांडले आहे, आणि सिनेमाच्या शेवटी येणारं एक पात्र जेव्हा हे सगळं काही बदलून टाकते, तेव्हा आपण केलेले विचार, कल्पना, हे सगळं काही पुसलं जात, निसर्गाचं प्रतिकात्मक रूप आपल्या समोर येते, आणि पुन्हा नव्याने विचार करायला दिग्दर्शक भाग पाडतो.
Writer- Rameshwar Jite
Comments
Post a Comment